देश

Sharad Pawar on Hindi: सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये, महत्त्वाचा मुद्दा असेल तर राज ठाकरेंच्या मोर्चात सहभागी होईन: शरद पवार

पहिली ते चौथी या प्राथमिक इयत्तांसाठी हिंदी सक्ती योग्य नाही. सरकारने तिथे हिंदीचा हट्ट करु नये. पण पाचवीपासून हिंदी भाषा येणे, हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. आज देशात 55 टक्के लोक हिंदी (Hindi Language) बोलतात. आज देशात दुसरी कोणतीही भाषा इतक्या मोठ्याप्रमाणावर बोलली जात नाही. मराठी, कानडी, मल्याळम आणि बंगाली या भाषांचा वापर ठराविक लोकसंख्येकडून केला जातो. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करुन चालणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्रातील लोक हे हिंदीच्या विरोधात नाहीत. पण पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे, त्यांच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लादणं योग्य नाही. तिथं मातृभाषा महत्त्वाची आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. यावेळी शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या 5 जुलै रोजी मुंबईतील मोर्चात सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होण्याच्या आवाहनासंदर्भात भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मी दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली आहेत. मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं समजून घेईन. त्यांनी कार्यक्रम जाहीर केले. त्या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं, असे त्यांचे म्हणणे आहे. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घेतलं पाहिजे. राज ठाकरे यांनी काय भाष्यं केलंय हे नेमकं समजून घ्यावं लागेल. कोणीही सांगतो आणि त्यामध्ये सहभागी व्हा, असं करता येणार नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याचा हिताचा असेल तर तो जाणून घेणं, त्यावर योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी शरद पवारांनी राज ठाकरे यांना, ‘मोर्चात कोण सहभागी होत नाही, ते बघतोच’, या भूमिकेवरूनही मिश्कील टोला लगावला. राज ठाकरेंनी असा का हट्ट का करावा की, सचिन तेंडुलकरने मराठीच्या मुद्दयावर बोलावे. त्यांनी त्याला क्रिकेटबद्दल विचारावं. बघून घेतो हे, राज ठाकरे यांचं बोलणं योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar on Thackeray brothers alliance: राज-उद्धव युतीवर शरद पवारांचं भाष्य
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी म्हटले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगले आहे. ते एकत्र येतील की नाही, हे मला माहिती नाही. कारण हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत, असे शरद पवारांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button