वैष्णवी मृत्यू प्रकरणात गृहविभागाची सर्वात मोठी कारवाई; IPS अधिकाऱ्याचा पदभार काढून घेतला

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणेनं 16 मे रोजी आत्महत्या केली. सुनेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि सर्व कुटुंबाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या कोठडीची हवा खात आहे. गृहविभागाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणात गृहविभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने चांगलाच दणका दिला आहे. नाशिक संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला आहे. सुपेकर यांचे नाव वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात जुळवण्यात आलं होते. सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सुपेकर हे शशांक हगवणे याचे मामा असल्याने त्यांचा या प्रकरणात जुळविले गेले आहे.
वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक हगवणे याचे मामा जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक आहेत. त्यांनी याप्रकरणात हगवणे कुटुंबाला मदत केली असण्याची दाट शक्यता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली होती. याबाबत झी २४ तासनं पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा सुपेकर यांनी दमानियांचे आरोप फेटाळून लावले होते. तसंच आपला हगवणे कुटुंबाशी या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितले होते.
तर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील भूमिका स्पष्ट केली होती. सुपेकरांचा हगवणेला वाचवण्यात सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई करू असं अजित पवार म्हणाले होते. वैष्णवीला मृत्यूच्या दिवशीही मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या 30 खुणा आढळल्यात. त्यातील 15 जखमा या मृत्यूपूर्वी 24 तासाच्या आतल्या असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. तर दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय.