देश

‘शपथविधीला आले असते तर…’; फडणवीसांच्या शपथविधीवरुन ठाकरे, पवारांना टोला! करुन दिली ‘ती’ आठवण

गुरुवारी मुंबईमधील फोर्ट परिसरातील आझाद मैदानावर झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थाप शरद पवारांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. या शपधविधी सोहळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. मात्र या सोहळ्याकडे विरोधकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. आता यावरुनच भाजपाने विरोधकांवर निशाणा साधला आहे.

भाजपाने साधला निशाणा
“हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती,” असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवरुन सुनावलं आहे. “काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेसचे नेते गैरहजर राहिले. हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून हे नेते शपथविधीला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची चाड आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

लोकांचा विश्वासघात करीत…
“2019 मध्ये उध्दव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करीत मविआसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यापूर्वीची उदाहरणे आहेत,” अशी आठवणही उपाध्ये यांनी करुन दिली. “निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता. मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले,” असा टोलाही उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये लगावला आहे.

राऊतांनाही सुनावलं
“आता तरी सुधरा….” असं म्हणत उपाध्ये यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. “संजय राऊत, खोटं बोलायला अजून पाच वर्षं मिळाली असली, तरी त्याचा सदुपयोग करा. खोटं बोलून पदरात फक्त निराशाच पडते. सोयीने आठवलेल्या बंद खोलीतल्या वचनांपासून ईव्हीएमपर्यंत धादांत खोटे बोलून, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगून राजकारण करता, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतून साकार झालेल्या लोकशाहीच्या उत्सवावरच आक्षेप घेता?” असा सवाल उपाध्ये यांनी विचारला आहे.

“एवढंच होतं, तर…”
“एवढंच होतं, तर काल उजळ माथ्याने शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला हवं होतं. ईडी, सीबीआय, न्यायालय, निवडणूक आयोग, ईव्हीएम हे जनतेचे मुद्दे नाहीत. जनतेची समस्या काय आहे ते पाहून सोडवण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला मदत करा. नाहीतर आयुष्यभर खोटे अग्रलेख खरडत बसलात, तरी त्याचा परिणाम काय होतो, हे आत्ताच्या निकालांनी दाखवले आहे,” असा टोला उपाध्ये यांनी पोस्टमधून लगावला आहे.
आता भाजपाच्या मुख्य प्रवक्त्यांच्या या टीकेला विरोधक काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button