Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ला होऊन दहा दिवस लोटले, नुसता गडगडाटच, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या? ठाकरे गटाच्या नेत्याचा मोदी सरकारवर प्रहार

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून (Central Government) कोणतीही ठोस आणि निर्णायक कारवाई झालेली नाही. आमचा नुसता गडगडाटच, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला आहे.
दहशतवाद्यांवर कारवाईसंदर्भात “तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा” अशी मोकळीक तीन दलप्रमुखांना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केलं. पण प्रत्यक्षात ही घोषणा म्हणजे देशवासीयांची फसवणूक आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
आजचं नेतृत्व जाहिरातबाजी अन् श्रेयासाठीच ओळखलं जातं
अनिल गोटे पुढे म्हणाले, इंदिरा गांधींनी अशा प्रकारची वल्गना केली नव्हती. त्यांनी थेट आणि निर्णायक निर्णय घेतले होते. आजचं नेतृत्व मात्र जाहिरातबाजी, आत्मप्रशंसा आणि श्रेयासाठीच ओळखलं जातं. देशभरात वृत्तपत्रे आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचे समर्थन करत आहेत. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने दिलेली आर्थिक मदत अपुरी असून, अशा प्रसंगी राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता सरकारने निर्णायक कृती करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा अनिल गोटे यांनी व्यक्त केली. तर आज सोशल मीडियावर ट्रेंड सुरू होतात, भाषणात शाब्दिक युद्ध चालते, पण वास्तवात काहीच घडत नाही. अशा घटनांनंतर राजकीय टीका न करता निर्णायक कृती झाली पाहिजे, असेही अनिल गोटे यांनी म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्या प्रकरणी एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तपास यंत्रणा असलेल्या एनआयएच्या (NIA) हाती या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे लागले असून, दहशतवाद्यांनी वापरलेली हत्यारे बेताब खोऱ्यात लपवून ठेवली होती, हे तपासात स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामागे लश्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानचा एकत्रित कट होता. ही कारवाई पूर्वनियोजित होती आणि तिची आखणी पाकिस्तानमधून करण्यात आली होती, असेही तपासात समोर आले आहे. तर पाकिस्तानच्या पाठबळावर चालणाऱ्या संघटनांचा संपर्क ‘हमास’शी असल्याची माहिती मिळाली आहे. हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसोबत आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, पहलगाम हल्ल्यातील एक संशयित आरोपी देखील या रॅलीत सहभागी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.