देश

Weather Forecast : मुंबई-पुण्यासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

हवामान विभागाकडून कोकणात अतिवृष्टी होणाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात काल दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची घटना घडलेली असतानाच आज पुन्हा एकदा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगडसह राज्याची राजधानी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच रत्नागिरी जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

इर्शाळवाडी येथे काल दरड कोसळून मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन आता कमालीचे सावध झाले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्रांची पुन्हा एकदा माहिती घेत तेथील ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यास कालपासून सुरुवात केली आहे. या सगळ्या दरड प्रवण क्षेत्रांवर प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. रायगडसाठी २० आणि २१ जुलै हे दोन दिवस धोक्याचा इशारा आहे. ठाणे व पालघर जिल्हालाही २० आणि २१ जुलै रोजी रेड अलर्ट असणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणासह आणखी कोणत्या भागात पाऊस कोसळणार?

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट तर सातारा जिल्ह्याला ऑरेंज आणि कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन

हवामान विभागाकडून कोकणासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी केवळ तातडीचं महत्त्वाचं काम असेल तरंच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये, असेही आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी अत्यंत कमी काळात कोकणात मोठा पाऊस पडल्याने या दुर्घटना घडत असल्याचं बोललं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button