कसबा-चिंचवड पोटनिवडणूक: कसब्यात धंगेकरांचा विजय, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर

पुण्यातील कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
कसबा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर धंगेकर यांनी तब्बल 11 हजार मतांनी विजय मिळवला.
तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांनीही पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे.
या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पार पडलं होतं.
कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी जोर लावल्याचं दिसून आलं. तसंच चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत रंगत आली होती.
कसबा : चौदाव्या फेरीपर्यंतची आकडेवारी
रवींद्र धंगेकर – 48986
हेमंत रासने – 44165
काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर 4 हजार 700 मतांनी आघाडीवर
चिंचवड : अकराव्या फेरीपर्यंतची आकडेवारी
अश्विनी जगताप – 35228
नाना काटे – 27794
राहुल कलाटे – 10669
भाजप उमेदवार अश्विनी जगताप 8554 मतांनी आघाडीवर
नेत्यांनी काय म्हटलं?
कसबा मतदारसंघात पराभवाचं तोंड पाहावं लागल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “नाना पटोले यांच मी अभिनंदन करतो. तीन राज्यांच्या निवडणुकीत कांग्रेस कुठे दिसत नाही. चिंचवडमध्ये ही त्यांनी विचार केला पाहिजे. थोडा तुम्ही ही विचार करा आणि आम्ही ही करतो.”
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कसब्याच्या निकालांवर प्रतिक्रिया दिल.
सकाळपासून मी कल पाहत होतो. पण निकाल हाती येईपर्यंत आम्ही प्रतिक्रिया दिली नाही. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडा गम, अशी झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली. रवींद्र धंगेकर यांच्या स्वरुपात आम्ही तिथे दिला होतो. आम्ही सर्वांनी मिळून येथील प्रचार केला. यातून महाराष्ट्रात एक संदेश जाणार आहे.
दोन्ही ठिकाणी सहानुभूती असूनसुद्धा धंगेकर यांनी मिळवलेला विजय कौतुकास्पद आहे, असं पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, धंगेकर यांच्या विजयानिमित्त काँग्रेस पक्षाकडून जल्लोष करण्यात येणार आहे. आज दुपारी 3 वाजता टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत या विजयाचा जल्लोष करण्यात येणार आहे, असं पटोले यांनी सांगितलं.
निकालांवर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, “कसब्याच्या आणि चिंचवडच्या निकालांमधून मतदार वेगळा विचार करू शकतात हे समोर आलं आहे. भाजपच्या विरोधात मतांची संख्या वाढत चालली आहे. महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र राहून मतांची बेरीच करणं, हे आता आमचं काम आहे.”
कसबा आणि चिंचवडमधला प्रचार का वैशिष्ट्यपूर्ण ठरला?
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे विधानसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या. त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.
कसबा आणि चिंचवड हे दोन मतदारसंघ भाजपच्या हातात होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीनेही उमेदवार दिले होते.
कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. तर चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी मिळाली.
या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पाहायला मिळाले.
“महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांमधले मोठे नेते प्रचारात पाहायला मिळाले. शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांसारखे सहभागी झाले. भाजपकडून मोठे नेते प्रचारात होते. पण त्याचसोबत भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावलेली दिसून आली. प्रभागांमध्ये त्यांनी नगरसेवकांवर जबाबदारी दिली. राज्यस्तरीय नेते जसे की देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे नेते सक्रीय होते. गिरिश महाजन आणि रविंद्र पाटील या हे ग्राऊंड लेवलवर काम करताना दिसले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार-पाच दिवस चिंचवड आणि पुण्यातच होते. याचसोबत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सात आठ दिवस मुक्कामी राहिले. रात्रंदिवस बैठका घेतल्या जात होत्या. यामुळे गेल्या पन्नास वर्षात कसब्याची निवडणूक चुरशीची झाली,” असं दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे चिफ रिपोर्टर ज्ञानेश्वर बिजले यांनी सांगितलं.
याचसोबत आजारी असलेले गिरिश बापटही पाहायला मिळाले. यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली.
कसबा-चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवारांना सहानुभूतीचा फायदा मिळेल?
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होते आहे. चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली.
पण कसब्यात तसं झालं नाही. मुक्ता टिळक यांच्या कुटूंबात तिकीट दिलं गेलं नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यावर टिळक कुटूंबातून नाराजीसुद्धा पाहायला मिळाली. आमदारांच्या निधनामुळे लोकांची सहानुभूती भाजपच्या उमेदवाराला फायदेशीर ठरेल का हा एक प्रश्न आहे.
विश्लेषकांच्या मते चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांना सहानुभूतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकेल. पण कसब्यात मात्र सहानुभूती हा मुद्दा आता मागे पडला आहे.
दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं की, “विद्यमान आमदारांच्या निधनानंतरची पोटनिवडणूकीत सहानुभुती फॅक्टर मोठा असतो. पुण्यात कसबा आणि चिंचवड या पोटनिवढणुका त्या अनुषंगाने नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. भाजपने त्या अनुषंगाने प्रयत्नही केला की ही निवडणूक बिनविरोध व्हावी.
“पण मागच्या काही पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीच. एकंदरीत सध्या राज्यातलं जे वातावरण बघितलं तर स्वतःच्या पक्षाची ताकद तपासून बघण्याची गरज सगळ्यांना वाटली असेल. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. राज्यात सत्तांतर झाले.
“महाविकास आघाडीचं सरकार गेलं. शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते आहे. यामुळे सहानुभुतीचा मुद्दा या निवडणुकीत सुरुवातीपासूनत मागे पडला.
“चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांना ती कदाचित ती मिळेल. पण कसब्यात तसं चित्र नाही. सहानुभुती असती तर भाजपला ज्या पद्धतीने कसब्यात ताकद लावावी लागत आहे ती लावावी लागली नसती,” दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.