Rising Sea Level: महाप्रलयाची चाहूल? मुंबई, लंडन, न्यूयॉर्कसहीत अनेक शहरं बुडणार; जाणून घ्या नेमकं घडणार काय?

जिनेवामधील जागतिक हवामान विज्ञान संघटनेनं (World Meteorological Organization म्हणजेच WHO) मंगळवारी जारी केलेल्या एका नव्या अहवालामध्ये भारत (India), चीन (China), बांगलादेश (Bangladesh) तसेच नेदरलॅण्डला जागतिक स्तरावर समुद्रातील पाणी पातळी वाढीचा सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं आहे. या देशांना समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यास सर्वात मोठा फटका बसू शकतो असं या अहवालात नमूद केलं आहे. डब्ल्यूएमओच्या अहवालाचं नाव ‘ग्लोबल सी-लेवल राइज अॅण्ड इम्प्लीकेशन्स’ असं आहे. वेगवेगळ्या खंडांमधील अनेक मोठी शहर समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने बुडण्याची शक्यता आहे. यामध्ये शांघाय, ढाका, बँकॉक, जकार्ता, मुंबई (mumbai), मापुटो, लागोस, काहिरा, लंडन (london), कोपेनहेगन, न्यूयॉर्क (new york), लॉस एन्जलीस, ब्यूनस आयर्स आणि सँटियागो सारख्या शहरांचा समावेश आहे.
अहवालात काय म्हटलं आहे?
या अहवालानुसार समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने निर्माण होणारं संकट हे जगासमोरील एक प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि मानव निर्मिती आव्हान आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली तर समुद्रकिनाऱ्याजवळची शेत जमीन आणि पाण्याचे साठे तसेच मूलभूत सोयीसुविधांबरोबरच मानवी जीवनावर आणि उपजिविकेवर मोठा परिणाम होईल. सामान्यपणे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने समुद्रात वाधळं येण्याचं तसेच तापमानामध्ये बदल होण्याचं प्रमाण वाढतं. न्यूयॉर्कमध्ये सॅण्डी आणि मोझॅम्बिकमध्ये इडाई चक्रवादळाने दिलेली धडक ही बदलाचे संकेत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. जलवायू संतुलन आणि समुद्र तसेच वायूमंडळाच्या भौतिक स्थितीवर आधारित भविष्याबद्दल बोलायचं झाल्यास WMO ने अंटार्टिकामधील सर्वात मोठा ग्लॅशियर (हिमखंड) वितळण्याची गती ही अनिश्चित आहे असं म्हटलं आहे.
अन्नधान्य उत्पादनावर परिणाम
अहवालानुसार समुद्रामधील पाण्याची पातळी वाढल्याने संपूर्ण जगभरामध्ये सारखेच परिणाम दिसतील असं नाही. याचे परिणाम स्थानिक पातळीवर वेगळे असतात. समुद्रातील पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या शहरांबरोबरच मूलभूत सेवांवर परिणाम होऊन जमिनीचा मोठा भाग पाण्याखाली जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या भूभागांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘जलवायू परिवर्तन खास करुन दुबळा क्षेत्रांमध्ये अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होईल. त्यामुळेच अन्नधान्याचं इतर भागांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी दबाव निर्माण होईल. जागतिक खाद्य सुरक्षा आणि पौषक आहार धोरणावर याचा परिणाम होईल. दुष्काळ, पूर आणि उष्णता अधिक तीव्र आणि गंभीर स्वरुप धारण करेल, समुद्राच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ झाल्याने खाद्य सुरक्षेसाठीचा धोका वाढेल,’ असं अहवालात म्हटलं आहे.
पाणी पातळी वाढल्यास…
WMO नुसार जागतिक स्तरावर समुद्राच्या पाण्याची पातळी 2020 च्या तुलनेत 0.15 मीटरने वाढली. तर संभाव्य स्वरुपात 100 वर्षांमध्ये समुद्रकिनारी पाणी पातळी वाढल्याने फटका बसणारी लोकसंख्या 20 टक्क्यांनी वाढलेली असेल. समुद्रामध्ये सामान्यपणे 0.75 मीटरची वाढ झाल्यास 40 टक्के आणि 1.4 मीटरपर्यंत वाढल्यास 60 टक्के लोकसंख्या प्रभावित होईल. या अहवालानुसार 2020 पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या 11 टक्के म्हणजेच 896 मिलियन लोक कमी उंची असलेल्या समुद्र किनाऱ्यांजवळ राहतात. 2050 पर्यंत ही लोकसंख्या 1 बिलियनहून अधिक असेल.