गुजरातमुळे महाराष्ट्रात ‘बत्तीगुल’! शेजारी राज्यामुळं महामुंबईत सक्तीचं भारनियमन

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाचा आकडा 38 ते 39 अंशांच्या पलिकडे पोहोचत असताना आणि शहरात उष्णतेच्या लाटेसदृश्य वातारण असताना अचानकच शहरातील काही भागांमध्ये भारनियमनाची परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मालाड, भाईंदर, मीरा रोड, बोरिवली, कल्याण, अंबरनाथ इथं भर उन्हाच्या तासांमध्ये साधारण 55 मिनिटं ते तासभर वीजपुरवठा खंडित झाला होता.
महावितरणच्या ग्राहकांकडून सातत्याने तब्बल 26000 मेगावॉटहून अधिक तर, मुंबईच्या ग्राहकांकडून 3600 मेगावॉटहून अधिक वीजमागणी आणि त्याचा पुरवठा होत असताना मंगळवारी महामुंबईसह वीज वितरणात खंड पडल्याचं पाहायला मिळालं. फक्त मुंबईच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही हीच स्थिती होती. एकाएकी अनपेक्षितरित्या, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झालेल्या या भारनियमानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्यक्षात राज्यात एकाएकी झालेल्या या भारनियमनास यानंतर गुजरात राज्य कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं.
गुजरातमुळे भारनियमन?
गुजरातमध्ये अनपेक्षितरित्या अतिरिक्त वीजेचा वापर झाल्यामुळं आणि या शेजारी राज्यानं वाढील वीज खेचल्यामुळं राज्याच्या महामुंबईसह इतर काही भागांमध्ये सक्तीचं भारनियमन लागू करण्याची अर्थात लोड शेडिंगची वेळ आली. मंगळवारी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तब्बल 4000 मेगावॉट विजेचं भारनियमन करण्यात आलं. जिथं गुजरातमधील विजेच्या वापरामुळं इथं महाराष्ट्रात भर दुपारी तासाभराहून अधिक काळ 10 लाखांहून अधिक नागरिकांची तासभर होरपळ झाली.
दरम्यान एकिकडे तासाभराचा हा त्रास नागरिकांनी सहन केलेला असतानाच हे भारनियमन केलं नसतं तर मात्र वीजपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळं याहून अधिक अडचणींचा सामना नागरीकांना आणि एक मोठा फडका राज्याला बससा असता असं तज्ज्ञांचं मत. महाराष्ट्र पारेषण वाहिन्यांच्या माध्यमातून गुजरातशी जोडला गेला असून, जर एखाद्या पारेषण वाहिनीमध्ये तांत्रिक अडथळा आला तर, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होतो. सर्व राज्यांच्या बाबतीत ही गोष्ट लागू आहे.