देश

Colonel Sophia Qureshi : पीएचडी सोडून सैन्यात भरती, बहीण चित्रपटसृष्टीत; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींबाबत 5 महत्त्वाच्या गोष्टी

भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या (Operation Sindoor) माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला असून, यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतला गेला आहे. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांचे तळ पीओकेसोबतच पाकिस्तानच्या आतील भागातही ध्वस्त करण्यात आले आहे. या ऑपरेशनसंबंधी सर्व माहिती कर्नल सोफिया कुरेशी (Sophia Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंग (Vyomika Singh) यांनी दिली होती. यानंतर कर्नल सोफिया कुरेशी या देशभरात चर्चेत आल्या आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्याबाबत 5 महत्त्वाची गोष्टी…

1. कर्नल सोफिया कुरेशी यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

2. पदव्युत्तर पदवीनंतर, सोफिया यांनी व्याख्याता म्हणून शिकवण्यास सुरुवात देखील केली.

3. जेव्हा भारत सरकारने सैन्यात उच्च पदांवर महिलांसाठी भरतीची घोषणा केली तेव्हा सोफिया यांनी त्यांची पीएचडी अर्ध्यावरच सोडली.

4. सोफिया कुरेशी यांच्या बहीण शायना कुरेशी या चित्रपटांशी संबंधित आहे. त्यांचे मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे.

5. सोफिया कुरेशी या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे नेतृत्व करणाऱ्या महिला अधिकारी आहेत. 

ऑपरेशन सिंदूरसंदर्भात देशाला माहिती देण्याची संपूर्ण जबाबदारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पार पाडली, त्यामुळेच त्यांचं विशेष कौतुक केलं जात आहे. त्यांनी हिंदीत तर विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी इंग्रजीत सैनिकी कारवाईची माहिती दिली. दोन महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीला नारीशक्तीचा प्रभावी संदेश मानलं जात आहे. ऑपरेशनचं नाव ‘सिंदूर’ आणि माहिती देणाऱ्या महिला अधिकारी, यामुळे एक मजबूत प्रतीक निर्माण झालं आहे.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मसूद अझहरच्या दहशतवादी कारवायांचा सडेतोड बदला घेतला गेला असून, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील जैश आणि लष्करशी संबंधित प्रमुख तळांवर निशाणा साधला आहे. बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, भिम्बर, कोटली आणि मुजफ्फराबादमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले करण्यात आले आहेत. या कारवाईत दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषज्ञांच्या मते, मुरीदके आणि बहावलपूर हे अत्यंत सुरक्षित मानले जाणारे भाग आहेत, जिथे पाकिस्तानी लष्कराचंही संरक्षण असतं. अशा ठिकाणी घुसून दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करणे ही भारतीय लष्कराच्या तीनही दलांची मोठी यशस्वी कामगिरी मानली जात आहे. पाकिस्ताननेही ही कारवाई झाल्याचे मान्य केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button