मंत्री उदय सामंत, संभाजीराजेंची स्पीड बोट भरकटली; अलिबागच्या किनाऱ्यावर मोठा अनर्थ टाळला

मुंबईहून अलिबागकडे येत असताना रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे छत्रपती यांची स्पीड बोट काही क्षण भरकटली. यामुळे सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला. या स्पीड बोटीवरील चालकाचे नियंत्रण काही क्षणासाठी सुटलं होतं. मात्र तातडीने बोटीवर पुन्हा नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीची बैठक आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात होती. या बैठकीला रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे छत्रपती स्पीडबोटीने अलिबाग येथे येत असताना हा धक्कादायक प्रकार घडला. त्यांची बोट मांडवा जेटटीजवळ आली असताना बोटीचा स्पीड वाढला. काही क्षणासाठी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या दोन खांबांना घासली गेली. एक छोटासा अपघात झाला.
थोडावेळ या दोघांनाही काय घडतंय हे समजलं नाही. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आमदार महेंद्र दळवीही मांडवा जेटीवर होते. समोरची घटना पाहून जेटीवरील सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकला. सुदैवाने तत्परता दाखवून बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवलं आणि पुढील अनर्थ टळला. ही घटना त्यांनी पत्रकारांना सांगितली.
यापूर्वीही एकदा पालकमंत्री उदय सामंत यांची बोट भर समुद्रात बंद पडली होती. त्यावेळी दुसऱ्या बोटीचा आधार घेत त्यांनी किनारा गाठला होता.