देश

Sambhaji Raje: मी योग्य दिशेने चाललोय!; मुख्यमंत्री भेटीनंतर संभाजीराजेंचे सूचक वक्तव्य

मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर यातून पुढे कोणता मार्ग काढता येईल, यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत निर्णायक पाऊल टाकण्याचे ठरवले आहे. ते आजच आपली पुढील दिशा स्पष्ट करणार आहेत. त्याआधी ते राज्यातील प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. आज संभाजीराजे यांनी आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ( Sambhaji Raje Meets Uddhav Thackeray )

मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्याआधी संभाजीराजे हे विविध घटकांशी चर्चा करत आहेत. मराठा समाजातील विभागवार प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर ते प्रमुख राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी आधी देवेंद्र फडणवीस आणि नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. ही बैठक जवळपास ४५ मिनिटं चालली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीनंतर संभाजीराजे यांनी मोजकीच पण सूचक प्रतिक्रिया दिली.

आज मुख्यमंत्री ठाकरे, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण तसेच महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची भेट झाली. या भेटीत कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. आरक्षण कसं मिळेल यावर केंद्रीत ही चर्चा होती. अडचणी निश्चितपणे आहेत पण त्यातून मार्ग काढता येईल, असे सर्वांचेच मत बनले. या मुद्द्यावर सर्व पक्ष कसे एकत्र येतील हे पाहायला हवे, अशीही चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी नमूद केले. मला वाटतं ज्या आशेने मी येथे आलो आहे, त्यादिशेने सर्व काही सुरू आहे, असे सूचक विधान संभाजीराजे यांनी यावेळी केले. आजच्या भेटीत शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आज पत्रकार परिषदेत मी अधिक भूमिका मांडेन असे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button